जम्मू कश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी CRPF जवानांवर केलेल्या हल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ४८ तासांत जिल्हा सोडा असा आदेश पाकिस्तानच्या नागरिकांना राजस्थानमधील बिकानेरच्या जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. या धुमश्चक्रीत एका मेजरसह लष्कराचे चार जवान आणि एक पोलीस शहीद झाला आहे. शहीद जवानामध्ये राजस्थानचे एस. राम यांच्या नावाचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर राजस्थानमधील बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी आदेशाचे परिपत्रक काढले आहे. त्यांनी जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू केला आहे. त्यानुसार त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

बिकानेर जिल्हाध्यक्ष कुमार पाल गौतम यांनी राजस्थान सीमा क्षेत्रातील सर्व हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहण्यास प्रतिबंध लावला आहे. हा आदेश दोन महिन्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे बिकानेर जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला वास्तव्य करता येणार नाही. कुमार पाल गौतम यांच्या या निर्णयाचे बिकानेरमध्ये कौतुक केले जात आहे. तर सोशल मीडियावर कौतुकाची थाप पडत आहे.

सोमवारी दहशवाद्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत शहीद झालेल्या एस. राम यांचे पार्थिव रात्री उशीरा बिकानेरमध्ये आले. आज मंगळवारी शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यासह काही नेत्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात सोमवारी १६ तास झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ‘जैश ए मोहम्मद’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना ठार केले. या धुमश्चक्रीत मेजर व्ही. एस. धोंडिअल (३३), हवालदार एस राम (३६) आणि शिपाई हरिसिंग (२६) व अजय कुमार (२७) शहीद झाले, तर चकमकीत सुरक्षा दलाचे नऊ अधिकारी-जवान जखमी झाले. त्यात दक्षिण काश्मीरचे उपपोलीस महासंचालक अमित कुमार यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानशी असलेले संबंध तोडून टाकण्याची सुरुवात केली आहे.