लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत आघाडी करण्याचे कोणतेही आश्वासन देण्यास आसाम गण परिषदेने नकार दिला. या विषयावर पक्षाने अद्याप कोणताही विचार केलेला नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष आणि आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंत यांनी स्पष्ट केले.
आम्ही या विषयावर आतापर्यंत कोणताही विचार केलेला नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील, असे महंत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भारतीय जनता पक्षाने अद्याप औपचारिकपणे आघाडीसाठी आसाम गण परिषदेकडे विचारणा केलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडी करण्यासंदर्भात मी आत्ताच काही सांगणार नाही. आधी आम्हाला एकत्रितपणे बसून चर्चा करू द्या, असेही ते म्हणाले. आसाममध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत.