उद्यापासून (सोमवार) संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. चीनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक मुद्यांवरून अधिवेशन वादळी होणार असून, दुसरीकडे करोनाचं सावटही गडद होत आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना करोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ऐन अधिवेशनाच्या एक दिवस अगोदरच पाच खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवस चालणाऱ्या अधिवेशन करोनाच्या भीतीच होणार आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक खबरदारीचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर सभागृह सदस्यांनाही ७२ तास अगोदर करोना चाचणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. आतापर्यंत पाच लोकसभा सदस्यांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अधिवेशनावरील करोनाची भीती आणखी गडद झाली आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊनच संसदेच पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर अधिवेशन होत असलं तरी करोनाचं संकट मात्र कायम आहे.

 

हे मुद्दे गाजणार…

करोनाच्या सावटाखाली होत असलेल्या यावेळच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती सरकारला लक्ष्य करण्यासाठी असंख्य मुद्दे आहेत. दिवसेंदिवस करोनाचा वाढत चाललेला आकडा, घसरलेला जीडीपी, लॉकडाउनचा सर्वसामान्यांना बसलेला फटका, वाढत चाललेली बेरोजगारी, चीनसोबत चिघळलेला सीमावाद, चीनकडून झालेली घुसखोरी यासह अनेक मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. त्यामुळे विरोधक सरकारला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रश्नोत्तराच्या तासावरूनही सभागृहांमध्ये विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळू शकतं. त्यामुळे मोदी सरकारसाठी हे अधिवेशन कसोटी प्रमाणे ठरण्याची शक्यता आहे.