तमिळनाडूत भाजप पाय रोवण्याचा प्रयत्न करत असताना, सत्तारूढ अण्णा द्रमुकने मैत्रीचे संकेत दिले आहेत. दोन्ही पक्षांदरम्यानचे संबंध कोणीही तोडू शकत नाही अशा शब्दांत पक्षाच्या मुखपत्रात अण्णा द्रमुकने मैत्रीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कावेरी वादाच्या मुद्दय़ावर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यात निदर्शने केली. त्याचा संदर्भ देत भाजप आणि आमच्यात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत असे अण्णा द्रमुकने स्पष्ट केले. भारतीय राजकारणात अण्णा द्रमुक व भाजप यांचे संबंध दुप्पट परिणामकारक (डबल बॅरल बंदुकीसारखे) असल्याची उपमा मुखपत्रात देण्यात आली आहे. कावेरी मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जबाबदारीने प्रयत्न करत असून त्याबाबतचा निर्णय दृष्टिपथात असल्याचा दावा मुखपत्रात करण्यात आला आहे. एकीकडे पंतप्रधानांची भेट घेण्याचा प्रयत्न करणे, दुसरीकडे त्यांना राज्यात आल्यावर काळे झेंडे दाखविणे असे द्रमुकचे दुटप्पी राजकारण असल्याचा आरोप अण्णा द्रमुकने केला आहे. द्रमुकला जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे त्यांच्या निदर्शनांना फारसा अर्थ नाही, असा टोलाही पक्षाने लगावला आहे. कावेरी जल नियामक समिती स्थापन करावी या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अण्णा द्रमुक राज्यात २५ व २९ एप्रिलला सभा घेणार आहे.