बिहार विधानसभा निवडणूक आणि गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या एआयएमआयएमने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएमचा ममतांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निवडणुकीआधीच खासदार ओवैसींना झटका बसला आहे. एमआयएमचे पश्चिम बंगाल प्रभारी झमीरुल हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महत्त्वाचं म्हणजे या निकालामुळे उत्साह वाढलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. आता बंगालमध्ये प्रचारामुळे राजकीय वातावरण तापत असतानाच ओवैसींना झटका बसला आहे.

एमआयएमचे पश्चिम बंगालचे प्रभारी जमीरूल हसन यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. हसन यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणाही केली. हसन हे इंडियन नॅशनल लीग या पक्षाची स्थापना करणार असून, त्यांनी पक्षाचा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला पाठिंबा असेल, असंही जाहीर केलं आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, इथे इंडियन नॅशनल लीगने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

हसन यांनी नाराजी दाखवली बोलून…

जानेवारीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी शरीफ जाकर पीरजादा अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे हसन नाराज झाले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं आता बोललं जात आहे. “मी २०१५मध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला होता. हा पक्ष बंगालमधील २० जिल्ह्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही कष्ट घेतले. याचा पुरावा म्हणजे देशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला लक्ष्य केलं नाही, मात्र ममतांनी केलं. आमच्या अनेक लोकांना अटक करण्यात आलं. मलाही अटक करण्यात आलं होतं. मात्र, असदुद्दीन ओवैसी जुन्या लोकांना किंमत देत नसल्याचं जाणवू लागलं होतं. त्यांनी एकदाही अटक करण्यात आलेल्या लोकांबद्दल पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली नाही,” अस हसन यांनी आज तक वृत्तवाहिनाली दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.