भारतात करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू या दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर इतर काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियानं ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. २४ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान नवे निर्बंध लागू असणार आहेत. एअर इंडियानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने घातलेल्या निर्बंधांनंतर भारतातील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. #FlyAI : Passengers who were to travel between India and UK, may kindly note that in view of recent restrictions announced by UK, flts from/to UK stand cancelled from 24th to 30th April '21. Further updates regarding rescheduling, refunds & waivers will be informed shortly.(2/2) — Air India (@airindiain) April 21, 2021 एअर इंडियानं बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, 'भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यूकेला जाणाऱ्या किंवा यूकेहून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स २४ एप्रिल ते ३० एप्रिल यादरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तिकिटांच्या परताव्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल', असं ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. (2/2)Between 24th to 30th April '21 we are in a process to schedule once a week flight to UK from Delhi & Mumbai. Information regarding the same will also be updated on our Website and Social Media Channels . — Air India (@airindiain) April 21, 2021 दरम्यान, २४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली आणि मुंबईहून यूकेला जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून त्यासंदर्भात लवकरच कळवलं जाईल, असं देखील एअर इंडियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातील करोना रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी आता चिंताजनकरीत्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.