केरळच्या थिरुअनंतरपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, विमान सुरक्षितरित्या उतरल्याने या विमानातील १३६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या विमानाचे दोन टायर फुटले असून विमानाला ट्रॅक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, AI263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे १३० प्रवाशी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

एका महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय विमान कंपनीसोबत अशी घटना घडली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रियादहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर जेट एअरवेजचे विमान धावपट्टीवरुन खाली उतरले होते. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यावेळी विमानातील १४९ प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आले होते.