काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना १९८४ मधील शिख विरोधी दंगलीप्रकरणी नुकतीच शिक्षा झाली. त्यानंतर देशातील शिख समाजाकडून काँग्रेस विरोधात रोष प्रकट करण्यात येत आहे. पंजाबमधील लुधियाना येथे युवा अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी राजीव गांधींच्या पुतळ्याला शाई लावली असून हाताला लाल रंग दिला आहे.

अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी १९८४ च्या शिख दंगली प्रकरणी राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. पंजाबमधील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. राजीव गांधी यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होइल, असे त्यांनी म्हटले. या घटनेनंतर काँग्रेसने राजीव गांधी यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली.