बांगलादेशची राजधानी ढाका येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने आता भारतातील मुस्लिम नागरिकांना प्रशासनाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. भारतातील मुस्लिमांनी देशात हल्ले घडवून आणावेत आणि देशातील पोलीस अधिकाऱयांना ठार मारावे, असे पत्रक ‘अल-कायदा’च्या भारतीय उपखंडाचा प्रमुख असिम उमर याने जारी केले आहे.
अल-कायदा ही दहशतवादी संघटना भारतीयांची संघटनेत भरती करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विविध मार्गाने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. त्यात अमेरिकेने उमरच्या संघटनेला ‘परदेशी दहशतवादी संघटना’ म्हणून आणि उमर याला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केल्याच्या चार दिवसांनी उमर याने भारतातील मुस्लिमांना देशात हल्ले घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकास्थित एका पोर्टलने जाहीर केलेल्या माहितीत देखील अल-कायदा आणि आयसिस या दोन्ही संघटना आपल्या ताफ्यात भारतीयांची भरती करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.