गुरुजी गोळवलकरांच्या कालबाह्य विचारांना संघाने तिलांजली दिल्याची कबुली सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा बुधवारी तिसरा दिवस होता. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांव आपले विचार मांडले. या भाषणाच्या वेळी त्यांना गुरुजी गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स बाबत प्रश्न विचारण्यात आला. या पुस्तकात गोळवलकरगुरुजींनी मुस्लिम समाज शत्रू असल्याचे म्हटले आहे यावर तुमचे मत काय? संघाच्या या विचारसरणीमुळे मुस्लिम समाजात जी भीती आहे ती कशी दूर होईल? असे प्रश्न भागवत यांना विचारण्यात आले. या प्रश्नांना उत्तरे देताना मोहन भागवत म्हटले, आपण सगळे भारतमातेचीच मुलं आहोत. सगळ्यांमधला बंधुभाव जपला पाहिजे, सगळे आपलेच आहेत, जे दुरावले आहेत त्यांना जोडायचे आहे. बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात जे विचार गुरुजींनी मांडले आहेत ते त्यावेळच्या परिस्थितीनुसार मांडले आहेत. त्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. गुरुजी गोळवलकर यांचे जे शाश्वत विचार आहेत त्यांचे संपादन करून एक पुस्तक छापण्यात आले आहे ज्याचे नाव श्री गुरुजी व्हिजन और मिशन असे आहे. या पुस्तकात तात्कालिक संदर्भ असलेल्या गोष्टी हटवण्यात आल्या आहेत. गुरुजींचे विचार शाश्वत आहेत समाज बांधणीसाठी उपयुक्त आहेत तेच या पुस्तकात ठेवण्यात आले आहेत असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. आपल्या याच भाषणात मोहन भागवत यांनी आरक्षणाचं समर्थन केलं आहे. राज्य घटनेत आरक्षणाबाबत जी तरतूद आहे त्याला संघाचे पूर्ण समर्थन आहे. तसेच एससी-एसटी अॅक्टचा दुरुपयोग होता कामा नये असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सामाजिक विषमता नाहीशी करून सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना तयार करण्यात आली आहे. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केली आहे त्या व्यवस्थेला संघाचे पूर्ण समर्थन आहे. मात्र हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचं आहे, ज्यांना त्याचा लाभ मिळतोय असेही भागवत यांनी स्पष्ट केले.