सकाळी मशिदीमध्ये होणाऱ्या अजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनी लेखी तक्रार केली आहे. कुलगुरू असणाऱ्या प्राध्यापिका संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे सकाळी माझी झोपमोड होते अशी तक्रार करणारं पत्र प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना तीन मार्च रोजी एक पत्र लिहिलं आहे. आता या पत्रावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी भानु चंद्र गोस्वामी यांनी नियमांनुसार यासंदर्भात करावाई केली जाईल असं म्हटल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. यापूर्वी लोकप्रिय गायक सोनू निगमनेही अजानसंदर्भात तक्रार करताना झोप मोड असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनही दीड वर्षापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता.

पहाटे पाच वाजता होते अजान

श्रीवास्तव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये रोज पहाटे साडेपाच वाजता मशिदीमध्ये अजान होते. एवढ्या पहाटे होणाऱ्या अजानच्या आवाजमध्ये झोपमोड होते, असं म्हटलं आहे. तसेच माझी झोपमोड झाल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तरी मला पुन्हा झोप लागत नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होत असल्याने याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचं श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे.

म्हणीचाही वापर

या पत्रामध्ये श्रीवास्तव यांनी एका म्हणीचाही वापर केलाय. Your freedom ends where my nose begins ही इंग्रजीमधील प्रसिद्ध म्हण श्रीवास्त यांनी आपल्या पत्रात वापरली आहे. सामाजात राहताना वेगवेगळ्या पंथाचे लोकं एकमेकांवर कसं संस्कृतिक आक्रमण करतात यासंदर्भात ही म्हण अनेकदा वापरली जाते. त्याचाच संदर्भ कुलगुरूंनी दिलाय. श्रीवास्तव यांनी हे पत्र एका विशिष्ट संप्रदाय, जाती किंवा वर्गाविरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. ते आपली अजान भोग्यांचा वापर न करताही करु शकतात. असं केल्याने इतरांचा दिनक्रम बाधित होणार नाही, असंही श्रीवास्त यांनी पत्रात नमूद केलं आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख

ईदच्या आधी तर पहाटे चार वाजताच या भोंग्यातून घोषणा केली जाईल. यामुळे सुद्धा मला आणि इतरांना त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय संविधानानुसार सर्व वर्गातील लोकांनी पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण मार्गाने रहावे असं म्हटल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पत्रात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख करण्यात आलाय. २०२० साली करण्यात आलेल्या जनहितयाचिका क्रमांक ५७० चा उल्लेख या पत्रात आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली पत्राची प्रत

श्रीवास्तव यांनी या पत्राची एक प्रत पोलीस आय़ुक्त, पोलीस महानिरिक्षक, पोलीस उप महानिरिक्षकांनाही पाठवली आहे. पोलीस उप महानिरिक्षक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळालं असून या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात कायदेशी कारवाई करण्यास सांगण्यात आल्याचं त्रिपाठी म्हणालेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.