भाजपच्या गुंडांना पळी, कालथ्याने ‘प्रसाद’ द्या- ममता

जनतेला मतदानापासून रोखण्यासाठी भाजपने बाहेरून गुंड आणत आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी येथे केला आणि पळी, कालथा आणि स्वयंपाकघरातील अन्य भांड्यांचा वापर करून अशा गुंडांना चांगलाच ‘प्रसाद’ देण्याचे आवाहन ममता यांनी महिलांना केले.

पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील नारायणगड आणि पिंगला येथील जाहीर सभांमध्ये ममतांनी भाजपचे उमेदवार सुवेन्दू अधिकारी आणि त्यांचे कुटंबीय देशद्रोही असल्याचे म्हटले. अधिकारी कुटुंबातील एक सदस्य शुक्रवारी रात्री पैसे वाटत असल्याचे दिसत होते, असा दावाही ममतांनी केला.

अधिकारी यांच्या कुटुंबातील एक जण पैसे वाटत होता, त्या परिसरातील महिलांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांना त्याला अटक करण्यास सांगितले, इतकेच नव्हे तर भाजपने बाहेरून आणलेल्या ३०हून अधिक भाडोत्री गुंडांना या महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतरच भाजपचे भवितव्य सीलबंद होईल, असेही त्या म्हणाल्या.

भाजपचे ज्या ठिकाणी काही प्रमाणात अस्तित्व आहे तेथे बाहेरून गुंड आणले जात आहेत, त्यामुळे महिलांनी पळी, कालथा आणि स्वयंपाकघरातील अन्य भांड्यांचा वापर करून अशा गुंडांना चांगला ‘प्रसाद’ द्यावा, असे आवाहन ममतांनी केले.