दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याविरुद्धचा संघर्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेला आहे. दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे काम करू द्यावे, अशी विनंती मोदी यांना करतानाच केजरीवाल यांनी, केंद्र सरकार दिल्ली प्रशासन चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला.
मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केजरीवाल यांनी, जंग यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा उल्लेख केला. ज्येष्ठ अधिकाऱ्यांना कोणते काम द्यावयाचे त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडून आलेल्या सरकारला असावा, असे पत्रात म्हटले आहे.
केंद्र सरकार नजीब जंग यांच्यामार्फत घटनाबाह्य़ पद्धतीने दिल्ली सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे काम करू द्या, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.