तामिळनाडूतील वेदारण्यम येथे काही समाजकंटकांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. अपघाताच्या कारणावरून हिंसक झालेल्या दोन्ही गटांनी दगडफेक करीत जाळपोळ केली. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केली आहे.

वेदारण्यम येथे पायी जात असलेल्या एका दलित व्यक्तीला कारने धडक दिली. यात त्या व्यक्तीच्या पायाला गंभीर जखम झाली. अपघातानंतर सवर्ण समुदायातील असलेल्या कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढत जवळच असलेल्या वेदारण्यम पोलीस ठाण्यात आश्रय घेतला. यावेळी घटनास्थळी आलेल्या जखमी व्यक्तीच्या मित्रांनी कारचालकाला ओळखले. जखमी व्यक्तीला व्यक्तीला वेदारण्यम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचदरम्यान, कारचालकाने जुन्या वादातून हे कृत्य केल्याची अफवा पसरली. त्यानंतर दलित समुदायातील नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. तसेच कारचालकाला बाहेर आणण्याची मागणी करीत दगडफेक केली. यावेळी कारही पेटवून देत आजूबाजूच्या परिसरातही हिंसक जमावाने थोडफोड केली.

दरम्यान, कार पेटवून दिल्याचे चालकाच्या समर्थकांना कळले. कारचालकाचे समर्थकही पोलीस ठाण्याबाहेर जमले. या जमावाने पोलीस ठाणे आणि बस स्थानक रस्त्यावरील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेचे दृश्य सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
ज्या रुग्णालयात जखमीला दाखल करण्यात आले होते. त्या रुग्णालयाबाहेरही जमावाने धुडगुस घातला. जखमीला तिरूवरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तोडफोडीत जखमी झालेल्या कारचालकाच्या दोन समर्थकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तिरूची परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक व्ही. वरदराजू यांनी घटनास्थळा भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपमहानिरीक्षक जे. लॉगनाथन म्हणाले, ४०० पोलीस तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन्ही समुदायातील ३७ जणांना अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.