सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दगडफेक, जाळपोळ; पोलिसासह चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह इतर तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले.

दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थक सलग दुसऱ्या दिवशी आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहने, आसपासच्या घरांना तसेच, गोदाम-दुकाने यांनाही आग लावण्यात आली. एका तरुणाने पोलिसांवर पिस्तूल रोखून धरले आणि नंतर हवेत गोळीबार केला. या हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह किमान दहा पोलीस जखमी झाले.

हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी जवान तनात करण्यात आले. पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांडय़ा फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून, मेट्रो रेल्वे स्थानकेही बंद करण्यात आली आहेत. भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत पोहोचण्याच्या काही तास आधी हिंसाचार भडकला.

शाहीनबागप्रमाणे जाफराबाद परिसरातही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केले जात असल्याने आसपासचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शनिवारी रात्री तिथल्या महिलांनी ‘शांती मोर्चा’ काढला होता. जाफराबाद मेट्रो स्थानकापासून दोन किलोमीटरवर असलेल्या मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकाजवळ रविवारी दुपारी भाजपचे वादग्रस्त नेते कपिल मिश्रा यांनी कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. जाफराबादमधील आंदोलकांना तीन दिवसांत हटवण्याचा इशारा त्यांनी दिल्ली पोलिसांना दिला होता. ट्रम्प यांचा दिल्ली दौरा संपण्याची वाट पाहात असल्याचे मिश्रा यांनी समर्थकांना सांगितल्याची चित्रफीतही सर्वत्र पसरली होती. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कपिल मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषणे केली होती. त्यामुळे ते वादात सापडले होते. रविवारी घटनास्थळावरून मिश्रा गेल्यानंतर लगेचच सुधारित नागरिकत्व कायद्याचे विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसाचार भडकला. त्यानंतर मिश्रा यांनी सोमवारी ट्वीट करून शांततेचे आवाहन केले. कुठल्याही समस्येवर हिंसाचार हे उत्तर नव्हे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल तसेच मनीष सिसोदिया यांनी शांतता राखण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले आहे. या हिंसाचाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नायब राज्यपाल अनिल बजल यांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याची सूचना केली. हिंसाचार जाणीवपूर्वक भडकवल्याचा दावा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली.

 

पाच मेट्रो स्थानके बंद

हिंसाचारामुळे दिल्ली मेट्रो रेल्वेची पाच स्थानके सोमवारी बंद ठेवण्यात आली. जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, गोकुळपुरी, जोहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार ही स्थानके बंद करण्यात आल्याचे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने जाहीर केले.

शांततेचे आवाहन शांततापूर्ण मार्गाने आंदोलन हे निरोगी लोकशाहीचे निदर्शक आहे. मात्र हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. दिल्लीतील हिंसाचार अस्वस्थ करणारा आणि निंदनीय असून, जनतेने शांतता राखावी, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तोंडावर दिल्लीत हेतूपूर्वक हिंसाचार घडविण्यात आल्याचे दिसते. सरकार हिंसाचार खपवून घेणार नाही. हिंसाचार घडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.

– जी किशन रेड्डी, केंद्रीय गृहराज्यमंत्री