बांगलादेशासमवेत कोणताही करार करण्यात आलेला नसल्याने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न सोडवू शकले नाहीत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.
त्या वेळी बांगलादेशासमवेत भूभाग सीमा करार करण्यात आला नव्हता, त्यामुळे सीमेच्या कुंपणाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही, आता आम्ही करार केला आहे, असे शहा यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि आसाममध्ये प्रफुल्लकुमार महंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते तरीही या दोघांनी सीमाप्रश्न का सोडविला नाही, असा प्रश्न शहा यांना विचारण्यात आला होता.
घुसखोरीचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आवश्यक आहे, केवळ आसाम सरकार हा प्रश्न सोडवू शकत नाही, असे ते म्हणाले.