ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली. हैदराबादच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपा संपूर्ण ताकदीनीशी उतरला आहे. दरम्यान, अमित शाह यांनी रोड शो नंतर रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला.

“ओवेसी यांनी लिहून द्यावं, रोहिग्यांना बाहेर काढलं जाईल. परंतु जेव्हा आम्ही कायदा आणतोतेव्हा लोकं संसदेत गोंधळ घालायला लागतात. रोहिग्यांवर आम्ही जेव्हा कारवाई करतो तेव्हा विरोधी पक्ष गोंधळ घालतात. ओवेसींनी एकदा आम्हाला लिहून द्यावं की बांगलादेशी रोहिंग्यांना काढून टाका. मग मी काही करतो,” असं अमित शाह म्हणाले. जर हैदराबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं वास्तव्य असेत तर अमित शाह कारवाई का नाही करत असा सवाल ओवेसींनी केला होता. त्या प्रश्नाला अमित शाहंनी प्रत्युत्तर दिलं.

“आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करण्यासाठी आणि मिनी इंडिया बनवणार आहोत. आम्हाला हैदराबादला एक आधुनिक शहर बनवायचं आहे. जे शहर निजामाच्या संस्कृतीतून मुक्त असेल,” असंही शाह म्हणाले. भाजपाला समर्थन देण्यासाठी मी हैदराबादच्या लोकांचे आभार मानतो. यावेळी भाजपा आपल्या जागा वाढवण्यासाठी किवा आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी लढतनाही आहोत. परंतु यावेळी हैदराबादचा महापौर हा आमच्याच पक्षाचा असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजाही केली. रोड शो नंतर आयोजित पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी यावेळी निवडणुकांमध्ये भाजपा बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपाचाच असेल असा विश्वासही व्यक्त केला.