अमृतसरच्या राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ही मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. पंजाबमधील शांततेचं वातावरण भंग करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधावा आणि सज्ज राहावं असंही जाखड म्हणाले आहेत.


 


निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. हे दोघेही चेहरा झाकून आले होते. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर 10 ते 15 जण जखमी झाले. स्फोटानंतर या परिसरात एकच धावपळ उडाली. या हल्ल्यानंतर अमृतसरसह संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली असून नोएडा, दिल्ली, गुरुदासपूर, पठाणकोटसहीत इतर शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

घटनास्थळी अमृतसर पोलीस दाखल झाले असून हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत कसून तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच अमृतसर पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला होता, तसंच ज्या गावात ही घटना घडली ते गाव भारत-पाकिस्तान सीमेवर असल्यामुळे हा दहशतवादी हल्ला होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत. याशिवाय काश्मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने यापूर्वीच दिल्ली पोलिसांना दिली होती. तसेच जैश-ए-मोहम्मदचे 6-7 अतिरेकी फिरोजपूरला आले असून ते हल्ल्याचं षडयंत्र रचत असल्याचा इशाराही देण्यात आला होता.