आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला १५ हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात यासंबंधी आदेश जारी करत ४३ लाख मातांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत महिला ज्यांचं मुल सध्या शाळेत (पहिली ते बारावी) शिकत आहेत, मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित ते या योजनेसाठी पात्र आहेत.

शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तसंत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावा यासाठीही प्रयत्न आहे. महत्त्वाचं म्हणजे, अनाथ तसंच रस्त्यावर निवारा घेणारी मुलं जे स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संस्थांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

योजनेसाठी राज्य सरकारला २०१९-२० आर्थिक वर्षात ६४५५ कोटींचा खर्च येत असून त्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. लाभार्थी नेमके कोण आहेत याबाबत पारदर्शकता राहावी यासाठी ग्राम सचिवालयात यादी लावण्यात येणार आहे.