विधानसभा निवडणुकीला अवकाश असला तरी पश्चिम बंगालमध्ये राजकीय हादरे बसण्यास सुरूवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात पडझड सुरू झाली असून, २४ तासातच तृणमूलला दुसरा हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. १९ डिसेंबरला अधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त असून, हा तृणमूलला मोठा धक्का मानला जात आहे.

सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच तृणमूलच्या आणखी पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत.

आणखी वाचा- मुस्लिम मतदार तुमची जहागिरी नाही, ओवेसींच ममता बॅनर्जींना उत्तर

पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामं करता येत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. “राजीनामे महत्त्वाचे नसून, प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बामोणगोला विभागातही पाच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत,” असं तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “ओवेसीला विकत घेऊ शकेल असा आजपर्यंत कुणी जन्माला आलेला नाही”

यापूर्वी पक्षावर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानं तृणमूलमध्ये भूकंप आला. अधिकारी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. तर दुसरीकडे तृणमूलनं भाजपावर नेत्यांना फोडत असल्याचा आरोप करत निशाणा साधला आहे.