उपहार चित्रपटगृह आग दुर्घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहाचे मालक व रिअल इस्टेट उद्योजक सुशील व गोपाल अन्सल या बंधूंना प्रत्येकी ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. १९९७ मध्ये उपहार चित्रपटगृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्युमुखी पडले होते तर १०० जण जखमी झाले होते.
उपहार चित्रपटगृहाच्या आगीनंतर लगेच अन्सल बंधूंना अटक झाली होती. सुशील व गोपाल यांना अनुक्रमे पाच व चार महिन्यांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी त्रिसदस्यीय पीठापुढे झाली.
सीबीआय आणि या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांतर्फे युक्तिवाद करणाऱ्या संघटना यांनी अन्सल बंधूंना आणखी तुरुंगवास ठोठावण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावत दोघांनाही प्रत्येकी ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. येत्या तीन महिन्यांत हा दंड दिल्ली सरकारकडे भरावयाचा असून दिल्ली सरकारने या रकमेचा विनियोग लोकोपयोगी योजनांसाठी करावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशात बजावले आहे.
या आगकांडानंतर चित्रपटगृहांतील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.