पाकिस्तानकडून व्हिसा नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरून बुधवारी काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी अनुपम खेर यांना लक्ष्य केले. तिवारी यांनी अनुपम खेर हे सहिष्णुतेचे पोस्टर बॉय असल्याची खरमरीत टीका केली. सहनशील भारतातील पोस्टरबॉय अनुपम खेर यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची एवढी हौस आहे. तर, त्यांनी व्हिसा मिळत नसल्याने पंतप्रधान मोदींशी संपर्क साधावा. ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी बोलून त्यांना कराचीला पाठवतील, असे तिवारी यांनी म्हटले. अनुपम खेर यांनी मंगळवारी पाकिस्तानकडून व्हिसा नाकारण्यात आल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. कराचीतील चार दिवसांच्या साहित्य महोत्सवासाठी आयोजकांनी १८ भारतीयांना निमंत्रित केले होते त्यात अनुपम खेर यांचा समावेश होता पण खेर यांनाच व्हिसा नाकारण्यात आला होता. ज्या इतर सतरा जणांना व्हिसा मिळाला, त्यामध्ये काँग्रेस नेते सलमान खुर्शीद व नंदिता दास यांचा समावेश आहे. अनुपम खेर यांना सरकारने अलिकडेच पद्मभूषण सन्मान दिला आहे. खेर यांनी सांगितले की या घटनेबाबत आपल्याला खेद वाटतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व काश्मिरी पंडितांचा उपस्थित केलेला मुद्दा, देशभक्ती या कारणाने व्हिसा नाकारला असावा, अशी शंका वाटते. मला या निर्णयाचे वाईट वाटते. अनेकांना व्हिसा दिला पण मलाच दिला नाही. आम्ही त्यांच्या कलाकारांचे भारतात स्वागत करतो. माझ्या कलेचे भारतात स्वागत होत असेल, तर ती इतर ठिकाणीही स्वागतार्हच असली पाहिजे, असे अनुपम खेर यांनी म्हटले होते. If the #posterboyof "tolerant" India is so keen to go to Pak his friend PM Modi can surely talk to his drop by friend Nawaz & facilitate it? — Manish Tewari (@ManishTewari) February 3, 2016