सर्जिकल स्ट्राइकची दुसरी वर्षपूर्ती भारतीय लष्कर ‘पराक्रम पर्व’ म्हणून साजरी करणार आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला येत्या २९ सप्टेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय लष्कर २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ‘पराक्रम पर्व’ साजरे करणार आहे. या पराक्रम पर्वामध्ये भारतीय सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराच्या स्पेशल कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. या कारवाईतून भारताने उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला होता. यापुढे पाकिस्तानची कुठलीही आगळीक खपवून न घेता त्याच भाषेत प्रत्युत्तर देणार असल्याचे संदेश लष्कराने या सर्जिकल स्ट्राइकद्वारे दिला होता.

या पराक्रम पर्वामध्ये युद्ध, दहशतवाविरोधी लढाईत बलिदान देणाऱ्या जवानांचे स्मरण करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी एक व्हिडिओ टि्वट करुन या पराक्रम पर्वाची माहिती दिली आहे.