काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलेल्या विधानाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी समर्थन केले आहे. काश्मीरमधील प्रत्येक जण दहशतवाद्यांचा समर्थक आहे, असे लष्कर मानत नाही. पण जर लष्कराविरोधात कुणी काही करत असेल तर लष्कराच्या अधिकाऱ्यांना दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे, असे पर्रिकर यांनी ठामपणे सांगितले.

लष्कराच्या कारवाईदरम्यान स्थानिक पातळीवर कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर, त्यावेळी कमांडिग ऑफिसरला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. काश्मीरमधील प्रत्येक व्यक्ती दहशतवाद्यांचे समर्थक आहे, असे लष्कर अजिबात मानत नाही. पण जे दहशतवाद्यांच्या बाजुने आहे, ते दहशतवादीच आहेत, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले. दरम्यान, यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनीही लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या दगडफेक करणाऱ्यांविरोधातील कारवाईबाबत केलेल्या विधानाचे समर्थन केले होते. दगडफेक करणारे आणि राष्ट्रहिताविरोधात काम करणाऱ्यांविरोधात कारवाई ही झालीच पाहिजे. कारण राष्ट्रहित सर्वात महत्वाचे आहे, असे रिजिजू यांनी म्हटले होते.

लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्यांविरोधातील कारवाईसंदर्भात वक्तव्य केल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि रिजिजू यांनी त्यांचे समर्थन केले होते. काश्मीर खोऱ्यात दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी खोऱ्यातील स्थानिक लोकांच्या शत्रुत्वाच्या वागण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. तसेच सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवायांदरम्यान जवानांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर पावले उचलत देशविरोधी कारवाई केली जाईल, असे वक्तव्य केले होते.
रावत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी बिपिन रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.