लष्कर-ए-तोएबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. काश्मीरमधील बुडगाम जिल्ह्यात हयातपुरा या गावात दहशतवादी आणि लष्कराची चकमक झाली त्यामध्ये दोन दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय रायफल्सचे जवान पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक सुरू झाली. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव युनुस मकबूल गणई आहे. तो चदुरा या भागातील पत्रिग्राम या गावचा रहिवासी होता असे पोलिसांनी म्हटले.

दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणाहून एके-४७ आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या चकमकीमध्ये सुदैवाने कुणी नागरिक किंवा जवान जखमी झाला नसल्याचे कालिया यांनी सांगितले. नागरिकांना किंवा जवानांना काही इजा होणार नाही याची काळजी यावेळी घेण्यात आली होती असे कालिया यांनी म्हटले.