प्रश्नपत्रिका फुटल्याने बिकानेर येथील लष्कर भरती परीक्षा रविवारी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
ऑल इंडिया सेना भरती (जनरल डय़ुटी सैनिक) परीक्षेचा लेखी पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आर्मी पब्लिक स्कूलमध्ये रविवारी सकाळी १० वाजता ही परीक्षा सुरू होणार होती. पेपर फुटल्याने ती रद्द करण्यात आली, असे समन्वयक अजय कपिल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणी चार माजी लष्करी अधिकाऱ्यांसह नऊ जणांना राजस्थान विशेष कृती दलाने पोलिसांच्या ‘एटीस’ शाखेच्या मदतीने अटक केल्याचे ते म्हणाले. ७०० उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी बिकानेर येथील लष्करी सार्वजनिक शाळेत जमा झाले होते. परंतु प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच परीक्षा रद्द करण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. पहाटे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.