भारतीय लष्कराचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारताच्या पाच सैनिकांना ठार केल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा ‘काल्पनिक’ असल्याचे लष्कराने गुरुवारी सांगितले.

सीमेवर झालेल्या गोळीबारात आपले ३ सैनिक, तर भारताचे ५ सैनिक ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये केल्यानंतर लष्कराने ही प्रतिक्रिया दिली.

जम्मू- काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवरून लक्ष वळवण्यासाठी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढवला असल्याचाही आरोप गफूर यांनी केला. या गोळीबारात अनेक बंकर नष्ट झाले, दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे, असा दावा त्यांनी केला. या दाव्याबद्दल विचारले असता, तो काल्पनिक असल्याचे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भारताने जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर सैन्याची संख्या वाढवली असल्याचे वृत्त आहे.