जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्याच्यावेळी मारल्या गेलेल्या सहा अतिरेक्यांकडे जी अन्नाची पाकिटे सापडली त्यावर ती पाकिस्तानात तयार केल्याचे म्हटलेले आहे, असे शुक्रवारी झालेल्या या चकमकीनंतर स्पष्ट झाले आहे.
लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी अन्नाची जी पाकिटे सापडली त्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे.
या मृत अतिरेक्यांकडे बरीच शस्त्रास्त्रे व दारूगोळा होता. शिवाय अन्नाची पाकिटे होती याचा अर्थ ते दीर्घकाळ लढण्याच्या उद्देशानेच आलेले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये ९ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे, त्यामुळे मतदारांना घाबरवण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी काश्मीरला भेट देत असून त्यांच्या सभेत घातपात करण्याचा अतिरेक्यांचा डाव असल्याची माहितीही गुप्तचरांना मिळाली आहे. उरीमधील  मोहरा या ठिकाणी लष्कराच्या छावणीवर अतिरेक्यांनी शुक्रवारी हल्ला केला होता. अतिरेक्यांकडे सहा एके रायफली, ५५ काडतुसे, दोन शॉटगन, दोन निशादृष्टी दुर्बिणी, चार रेडिओ सेट, ३२ हातबॉम्ब व एक वैद्यकीय उपचार संच असे साहित्य सापडले होते.