ट्विटरवर जम्मू-काश्मीरचा प्रदेश हा भारतीय नकाशाऐवजी चीनच्या नकाशात दाखवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देशातील नामवंत विचारवंतांच्या संस्थांपैकी एक असणाऱ्या ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन’ (ओआरएफ) या थिंक टँकच्या एका सदस्याने ही गोष्ट ट्विटर इंडियाच्या लक्षात आणून दिली आहे.

ओआरएफचे सदस्य असणाऱ्या कांचन गुप्ता यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ट्विटरवरील एका लाइव्ह व्हिडीओच्या नोटीफिकेशनचा स्क्रीनशॉर्ट गुप्ता यांनी शेअर केला असून त्यामध्ये जम्मू-काश्मीर हा पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग असल्याचे म्हटले आहे. “तर ट्विटरने भूगोल बदलून जम्मू-काश्मीरला पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग घोषित केलं आहे. याला भारतीय कायद्याचे उल्लंघन नाही तर काय म्हणायचे? यासाठी भारतीयांना अनेकदा शिक्षा झाली आहे. मात्र अमेरिकेतील मोठ्या कंपन्या आपल्या कायद्याहून मोठ्या आहेत का?,” असं ट्विट गुप्ता यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी भारताचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनाही टॅग केलं आहे.

त्यानंतर अन्य एका ट्विटमध्ये लेह सुद्धा चीनचा भाग असल्याचे ट्विटरकडून दाखवण्यात येत असल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

गुप्ता यांचे हे ट्विट व्हायरल झालं असून हजारो लोकांनी ते रिट्विट केलं आहे. अनेकांनी केंद्र सरकारने यासंदर्भात कठोर निर्णय घेत दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

“ट्विटर आणि ट्विटर इंडिया तुमच्या म्हणण्यानुसार लेह चीनचा भाग आहे,” असं एका नेटकऱ्याने स्क्रीनशॉर्ट पोस्ट करत विचारलं आहे. “या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करा. सोशल मिडिया कंपन्यांना त्यांच्या मुर्खपणासाठी आता आपण जबाबदार धरण्यास आणि त्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहता कामा नये,” असं अन्य एकाने म्हटलं आहे. “यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन ट्विटर इंडियाविरोधात कारवाई करा. भारताच्या एकात्मतेला ते अशाप्रकारे गृहित धरु शत नाही. अशाप्रकारेचं वागणं सवयीचा भाग होण्याआधी त्यावर कारवाई करा,” असं दुसऱ्या एका व्यक्तीने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. गजर पडल्यास कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक करावी असे मतही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

ट्विटरचे स्पष्टीकरण

रविवारी सोशल नेटवर्किंगवर या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर सोमवारी ट्विटरने यासंदर्भातील स्पष्टीकरण जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी जम्मू-काश्मीर भारताचा भाग दाखवणे ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले आहे. तसेच आम्ही भारताच्या सर्वभौमत्वाचा आदार करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे.