हितसंबंधी लोक पंतप्रधानांवर टीका करत असल्याचा आरोप; निवडणुकीतील अपयशाने चिंता

देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेविरुद्ध सरकारवर चौफेर टीका सुरू असतानाच लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि कलाकारांचा एक गट नरेंद्र मोदी सरकारच्या समर्थनार्थ पुढे सरसावला. कथित वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात सुरू असलेला विरोध म्हणजे किरकोळ गोष्टींचा बाऊ करणे असून, काही ‘लाडावलेले’ लोक पंतप्रधानांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशातील ‘असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल’ केंद्र सरकारवर हल्ला करणाऱ्या बुद्धिवाद्यांवर टीका करताना या गटाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विजयामुळे देशातील बुद्धिवाद्यांचा एक वर्ग निराश झाला असून, निवडणुकीतील अपयशाचा इतर मार्गाने बदला घेतला जात आहे.

गेल्या काही आठवडय़ांत भारतात एक प्रेक्षणीय तमाशा पाहायला मिळत आहे. समाजात वाढत असलेल्या काल्पनिक असहिष्णुतेबाबत देशातील बुद्धिवाद्यांच्या एका गटाने संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यात वेगवेगळ्या गटांचे काँग्रेसजन, मार्क्‍सवादी, लेनिनवादी आणि काही माओवादीसुद्धा आहेत. भाजपला संसदेत स्पष्ट बहुमत मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच त्यांचे स्पष्ट लक्ष्य आहे. निवडणुकीतील अपयशाचा ते इतर मार्गाने बदला घेण्याचा प्रयत्न करीत असून प्रसारमाध्यमांनी ‘चीअरलीडर्स’सारखे काम करण्याचा त्यांना फायदा होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

अशा भारताच्या लोकांनी खोटय़ा प्रचारामुळे विचलित होऊ नये, असे आवाहन आम्ही करतो. केरळमधील कवी व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अक्किथम अच्युतन नंबुद्री, कन्नड कवी सुमतींद्र नाडीग, आयसीएचएरच्या सदस्य पूर्वी रॉय व मीनाक्षी जैन आणि पुणे विद्यापीठाच्या शांतिश्री पंडित यांचाही निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

’ सरकारला पाठिंबा देणाऱ्या, तसेच निदर्शकांवर टीकेचा आसूड ओढणाऱ्यांमध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) अध्यक्ष लोकेश चंद्र, लेखक, एस. एल. भैरप्पा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू कपिल कपूर, केंब्रिज विद्यापीठाचे मानद प्राध्यापक व आयसीएचआरचे सदस्य दिलीप चक्रवर्ती आणि आयआयएससीचे के. गोपीनाथ यांच्यासह ३६ बुद्धिवाद्यांचा समावेश आहे.

‘त्यावेळी कुठे होता’
काँग्रेसच्या राज्यात १९८४ साली घडलेले शीख समुदायाचे सुनियोजित हत्याकांड आणि डाव्या सरकारच्या सत्ताकाळात २००७ साली नंदीग्राम येथे झालेले शेतकऱ्यांचे हत्याकांड यातील बळींना कधीच न्याय मिळाला नाही, हे मोदी यांच्यावर हल्ला करणारे बुद्धिवादी सोयिस्कररीत्या विसरत असल्याचा टोला या लोकांनी लगावला आहे.