अरविंद केजरीवाल यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूत्रांचा हवाला देत केला.
मोदी सरकारने केवळ एका कार्यक्रमासाठी जाहिरातींवर एक हजार कोटी रुपये खर्च केले, असे केजरीवाल यांनी सूत्रांचा हवाला देत ट्वीट केले आहे. त्याच वेळी दिल्लीतील आप सरकारने वर्षपूर्तीच्या निमित्ताने केवळ १५० कोटी रुपयेच खर्च केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्ली सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व खात्यांनी मिळून केलेला खर्च १५० कोटी रुपयांहून कमी असल्याचा दावा केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे केला. आप सरकारने जाहिरातींवर वारेमाप खर्च केल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने केला होता.