दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल आणि केंद्र सरकारवर शनिवारी नव्याने हल्ला चढविला. आप सरकारने घेतलेले अनेक निर्णय नायब राज्यपालांमार्फत रद्द करण्याचा घाट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातला असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. इतकेच नव्हे तर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना पदावरून दूर करून त्यांना लवकरच अटक करण्याचेही मोदी यांनी ठरविले आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

दिल्ली उच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालानंतर, आप सरकारने घेतलेले निर्णय दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी स्पष्ट केले त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली. किमान वेतनात वाढ करणे आणि विजेच्या पुरवठय़ात खंड झाल्यास त्यासाठी वितरण कंपन्यांना जबाबदार धरणे आदी जनहितार्थ निर्णय रद्द करण्याचा घाट जंग आणि केंद्र सरकारने घातला आहे, असे केजरीवाल म्हणाले.

 

वापरा आणि नष्ट करा  हे आपचे धोरण!

योगेंद्र यादव यांचा आरोप

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाची वाटचाल वापरा आणि फेका कडून वापरा आणि नष्ट करा याकडे गेल्याची टीका पक्षाचे एकेकाळचे नेते योगेंद्र यादव यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आपचे दिल्लीतील बंडखोर आमदार पंकज पुष्कर यांनी यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषदेत दिल्ली सरकारवर टीकास्त्र सोडले. विधानसभेत सरकार भाषण स्वातंत्र्यांचा गळा घोटत असल्याची टीका पुष्कर यांनी केली. पंजाबमधील आपचे सहसंयोजक सुच्चासिंग छोटेपूर यांनाही लाचखोरीच्या आरोपावरून हटवण्यात आले. उमेदवारीसाठी ते पैसे घेत असल्याचे स्टिंगमध्ये उघड झाले होते.