पुढील महिन्यात रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष सत्रात ‘जनलोकपाल’ विधेयक पारित होईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शनिवारी) सांगितले.
याचसोबत  नव्या स्वातंत्र्य लढ्याला सुरवात झाली असून, पक्षातील कार्यकर्ते जनतेचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी कार्यरत झाले आहेत असे केजरीवाल म्हणाले.  तसेच यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भ्रष्टाचारमुक्त मोहिमेचे श्रेय घेण्याची संधी सोडली नाही.  दिल्लीमध्ये सध्या कोणत्याही चहावाला अथवा रिक्षावाल्याकडून कोणताही पोलीस लाच घेत नाही, असे ते म्हणाले.
या नव्या दिल्ली लोकायुक्त बिलामध्ये स्वतंत्र अन्वेषण आणि कायदेशीर कारवाईचा समावेश असेल. तसेच, या नव्या लोकायुक्तानुसार कोणत्याही सरकारी कर्मचारी किंवा कोणत्याही संस्थेतर्फे रोजगार मिळवणा-या व्यक्तीने सरकारकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे किंवा कोणत्याही प्रकारे मदत घेतल्यास त्या व्यक्तीस नोकरीवरून काढून टाकण्याचा किंवा त्याची पदान्वती करण्याचा अधिकार असणार आहे.