दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या निमंत्रक पदाचा बुधवारी राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बुधवारीच दिल्लीत होत असून, त्यामध्ये केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारण्याबाबत निर्णय होणार आहे. गेले काही दिवस आपमध्ये खदखदत असलेल्या अंतर्गत वादाला केजरीवाल यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे नवे वळण मिळाले आहे. आता राष्ट्रीय कार्यकारिणी याबाबत काय निर्णय घेते, याकडे दिल्लीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षात मतभेद असल्याची ‘आप’कडून जाहीर कबुली
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस यश पदरात टाकल्यानंतर आपमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत धुसफुस सुरू झाली असून, त्यामुळे केजरीवाल व्यथित झाले होते. पक्षांत सुरू असलेला संघर्ष किळसवाणा असून, त्यामुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि ही जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाशी केलेली प्रतारणा आहे, असे केजरीवाल यांनी मंगळवारी म्हटले होते. या किळसवाण्या संघर्षांत पडण्याची आपली इच्छा नाही, आपल्याला दिल्लीतील कारभारावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. या प्रकारांमुळे आपल्याला वेदना होत आहेत आणि दिल्लीकरांशी प्रतारणा केल्यासारखे वाटत आहे, त्यामुळे कोणत्याही स्थितीत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले होते.
‘आप’चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर ‘आप’मधील मतभेद चव्हाटय़ावर आले.