‘मूर्ख आणि खुनी यांच्यात आपण अडकून पडलो आहोत..आता देश कुणाची निवड करणार?’ असे ट्विट संगीत दिग्दर्शक विशाल दादलानीने केले आणि ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘रिट्विट’ केल्याने ते वादात अडकण्याची शक्यता आहे.
केजरीवालांनी रिट्विट केलेल्या ट्विटच्या आशयानुसार, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे खुनी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मुर्ख असल्याचे मत अरविंद केजरीवांनी व्यक्त केले आहे. मोदींना दंगलीची पार्श्वभूमी असल्याने आणि राहुल गांधी त्यामानाने नवखे असल्याच्या आशयाचा ट्विट विशाल दादलानीने केला आहे. महत्वाचीबाब अशी की, हे ट्विट मुख्यमंत्री केजरीवालांनी रिट्विट केल्याने राजकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

असे ‘रिट्विट’ करण्याखेरीज दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दुसरी काही कामे नाहीत. जनतेचे प्रतिनिधीत्व करताना अशा आशयातून टीका करणे एका मुख्यमंत्र्याला शोभत नसल्याचे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सिथारामन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दिल्लीतील सरकार निवडून आल्यापासून वादातच राहीले असल्याचेही त्या म्हणाल्या.