आयआयटीचे विद्यार्थी असलेले अरविंद केजरीवाल हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर हेसुद्धा आयआयटीचे विद्यार्थी आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील अजित सिंग व जयराम रमेश यांनीही आयआयटीत उच्च शिक्षण घेतले आहे.
केजरीवाल हे कानपूर आयआयटीत शिकलेले असून त्यांनी १९८९ मध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. र्पीकर हे धातू अभियंता असून ते मुंबई आयआयटीत शिकलेले आहेत. केजरीवाल यांच्या प्रमाणे केंद्रीय मंत्री अजित सिंग हे खरगपूर आयआयटीचे बी.टेक पदवीधारक आहेत तर जयराम रमेश यांनी मुंबई आयआयटीतून मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. रमेश यांच्याबरोबर नंदन नीलेकणी हेसुद्धा शिकत होते. ते मूड इंडिगो टीमचे सदस्य होते. नीलेकणी यांनी इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या स्थापनेत मोठा वाटा उचलला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत नीलेकणी यांना दक्षिण बंगलोरमधून काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नीलेकणी व रमेश हे दोघेही १९७५ मध्ये मुंबई आयआयटीत होते. १९९३ मध्ये जेव्हा इन्फोसिसची आयपीओ अपयशी ठरली, त्या वेळी नीलेकणी यांनी त्यांच्यापेक्षा तीन वर्षे वरिष्ठ असलेल्या रमेश यांना दहा हजार रुपयांची गुंतवणूक इन्फोसिसमध्ये करण्यास सांगितले पण रमेश यांनी तसे केले नाही, नंतर त्यांनी ती आपल्या आयुष्यातील मोठी चूक होती असे रमेश यांनी म्हटले होते. केजरीवाल मंत्रिमंडळातील सौरभ भारद्वाज, मनीष सिसोदिया हे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले असून ते आयआयटीचे विद्यार्थी नाहीत.
नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी रामलीला मैदानावर दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. केजरीवाल यांच्यासह शनिवारी एकूण सात जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. गृह, अर्थ, दक्षता, ऊर्जा नियोजन आणि सेवा ही खाती मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवली आहेत.
*अरविंद केजरीवाल – मुख्यमंत्री – गृह, अर्थ, दक्षता आणि सेवा.
*मनीष सिसोदिया – शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, स्थानिक स्वराज्य, जमीन आणि इमारत.
*सोमनाथ भारती – प्रशासकीय सुधारणा, विधि, पर्यटन आणि सांस्कृतिक.
*राखी बिर्ला – समाज कल्याण, महिला आणि बालविकास.
*गिरीश सोनी – कामगार, विकास आणि अनुसूचित जाती-जमाती विभाग.
*सत्येंद्र जैन – आरोग्य आणि उद्योग.
*सौरभ भारद्वाज – परिवहन, अन्न आणि नागरी पुरवठा आणि पर्यावरण.