दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी झाले. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. दरम्यान, अपघातग्रस्त प्रवाशांना केंद्र सरकारनं मदत जाहीर केली आहे.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी अपघातानंतर त्या ठिकाणचा दौरा केला. तसंच परिस्थितीची माहितीही घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांसाठी मदत जाहीर केली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत करण्यात येणार आहे. तर गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना २ लाख रूपयांची आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवशांना ५० हजार रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती हरदीपसिंह पुरी यांनी दिली.

आणखी वाचा- केरळ विमान अपघात : मृतांपैकी दोन प्रवासी निघाले करोना पॉझिटिव्ह

आणखी वाचा- … म्हणून वाचले अनेकांचे प्राण; दीपक साठेंच्या भावाची भावनिक पोस्ट

नक्की काय घडलं होतं?

हे विमान रात्री ७.४१ वाजता कोझिकोडच्या करीपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्डय़ात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३५ फुटी खड्डय़ात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बोइंग-७३७ हे विमान धावपट्टीवरू घसरल्याने हा अपघात झाला. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानात १७४ प्रवासी, दहा बालके, दोन वैमानिक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता, अशी माहिती हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली.