राजस्थानातील राजसमंद येथील हत्याकांडांचा उल्लेख करताना एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप सत्तेत आल्यापासून मुसलमानांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला. आज आमच्याच देशात आम्हाला निशाणा बनवण्यात येत आहे, कारण आम्ही मुसलमान आहोत. देशात सध्या असे सरकार आहे जे अशा विचारांचे कौतुक करीत त्याला खतपाणी घालत असल्याचे ते म्हणाले.

तीन वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी अशा घटना घडत असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, राजसमंद येथील एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांत समोर आला आहे. यात शंभूलाल रेगर नावाची व्यक्ती एका मुस्लिम व्यक्तीवर पाठीमागून हल्ला करुन त्याला जखमी केले. त्यानंतर त्याला जिवंत जाळून टाकले. यात त्या मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर हा शंभूलालने, लव जिहाद रोखण्यासाठी असे केल्याचे म्हटले होते.

या शंभूलालने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला होता. ज्या कामगाराची यात हत्या करण्यात आली होती तो पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी होता. या घटनेनंतर पश्चिम बंगाल आणि राजस्थान सरकारने त्या मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ केली आहे.