देशात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणांतील हिंदू आरोपींबाबत भाजप सरकारची भूमिका अतिशय सौम्य असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार आसादुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. माळेगाव, हैदराबाद बॉम्बस्फोटांतील आरोपी हिंदू धर्मातील असल्यामुळे त्यांच्या विरोधातील कारवाई सौम्य असल्याचे ओवेसी म्हणाले. दरवर्षी केवळ पाच लाख रोजगारसंधी उपलब्ध होत असताना मोदी सरकारने १.२० कोटी रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. प्रत्यक्षात या सरकारला जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही नियंत्रण ठेवता आले नसल्याचे ओवेसी म्हणाले. सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. आर्थिकदृष्टय़ा देशाला सावरण्यासाठी केंद्राकडे  धोरण नसल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.