एमआयएमचे नेते आणि हैदराबाद येथील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शनिवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं. देशात भयावह वातावरण तयार केलं जात असल्याचं ते म्हणाले. ‘ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही सहभाग नोंदवला नाही, पण महात्मा गांधींच्या मारेक-यांची ज्यांनी साथ दिली त्या शक्तींचा देशात भयावह वातावरण तयार करण्यामागे हात आहे’ असं ते म्हणाले.

‘ज्यांनी महात्मा गांधींना गोळी घातली, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात कधी सहभाग घेतला नाही, याउलट इंग्रजांची साथ दिली अशा शक्ती देशात भयावह वातावरण तयार करत आहेत’, अशी घणाघाती टीका ओवेसी यांनी शनिवारी आपल्या कार्यक्षेत्रात आयोजित एका सभेत बोलताना केली.

यापूर्वी ओवेसी यांनी एनडीए सरकारवर मुस्लिमांचा केवळ मतांच्या राजकारणासाठी उपयोग करण्याचा आरोप केला होता. सरकार मुसलमानांवर अन्याय करत आहे असं ते म्हणाले होते. एका न्यूज चॅनलसोबत बोलताना, मुसलमानांनी मुख्य प्रवाहात यावं अशी भाजपाची इच्छा नसल्याचं ते म्हणाले होते.