केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारत-चीन संघर्षाबाबत भूमिका मांडली. मात्र त्यांच्या भाषणावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. आज राजनाथ सिंह यांनी लोकसभेत केलेलं भाषण म्हणजे एक ‘घिनौना मजाक’ आहे असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावे देशाची क्रूर थट्टा सुरु आहे असं ओवेसी यांनी म्हटलं आहे. मला सदनात बोलण्याची संमती देण्यात आली नव्हती. जर ती मिळाली असती तर मी माझी भूमिका नक्की मांडली असती असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार हे इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्यात माहीर आहे. आज राजनाथ सिंह यांनी असं वक्तव्य केलं की आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा दलांसोबत असलं पाहिजे. संसदेचा प्रत्येक सदस्य सुरक्षा दलांसोबत आहेत याबाबत माझ्या मनात काहीही शंक नाही असंही ओवेसी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- ‘संयम हवा तिथे संयम ठेवला, शौर्य हवे तिथे शौर्य दाखवलं’, राजनाथ सिंह यांची दहा महत्त्वाची विधानं

राजनाथ सिंह काय म्हणाले?

“सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. LAC जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे. सीमा प्रश्नी जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असे सुद्धा करारात म्हटले आहे” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

दरम्यान जेव्हा राजनाथ सिंह यांचं भाषण झालं त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राजनाथ सिंह यांच्या भाषणावर टीका केली आहे. राजनाथ सिंह यांचं भाषण म्हणजे एक क्रूर थट्टा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.