स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या न्यायायीन कोठडीमध्ये ६ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आसाराम व अन्य चार सहका-यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत. आसारामांवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून पोलीसांनी सहा नोव्हेंबर पर्यंत आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत मागितली आहे. आज आरोपपत्र दाखल करणे अपेक्षित होते, परंतु पोलिसांनी मुदत वाढवतानाच कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जी न्यायालयाने मान्य केली.
आसारामबापूंच्या जयपूर येथील आश्रमात आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप एका सोळा वर्षीय मुलीने केल्यानंतर बापूंना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते कोठडीत आहेत. त्यानंतर आसारामबापू व त्यांचा मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील दोन बहिणींनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.  त्यामुळे त्यांच्या गुन्ह्यांची यादी वाढतच गेली.  जयपूरमधील प्रकरणी आसारामबापूंची कोठडी आज संपत होती. आज पुन्हा त्यांना सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी आसाराम बापू आणि त्यांच्या चार सहका-यांच्या कोठडीत वाढ केली.