आसाराम दोषी ठरल्याने आम्हाला न्याय मिळाला आहे. आता त्याला कडक शिक्षा होईल अशी आम्हाला आशा आहे. या शिक्षेद्वारे या प्रकरणातील ज्या साक्षीदारांची हत्या झाली तसेच जे बेपत्ता आहेत त्यांना न्याय मिळावा, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसारामच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान, या प्रकरणातील एकूण ४४ साक्षीदारांपैकी ९ साक्षीदारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार महेंद्र चावला यांनी देखील आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच इतर साक्षीदारांनाही जीवे मारण्याची धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आसारामच्या या खटल्यावर सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे. यात आसारामसह पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, अद्याप शिक्षा सुनावलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaram is convicted we have got justice says father of shahjahanpur victim in asaram rape case
First published on: 25-04-2018 at 11:29 IST