३० मार्च रोजी राजस्थान हा राज्याचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. याप्रसंगी अशोक गहलोत यांच्या नेतृत्वातील राजस्थान सरकार राज्यातील विविध तुरुंगात कैद असलेल्या सुमारे १,२०० कैद्यांची सुटका करणार आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शनिवारी देण्यात आली आहे. ज्या कैद्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव आहे त्यात झालेल्या शिक्षेपैकी बहुतांश शिक्षा पूर्ण झालेले आणि तुरुंगात चांगले वर्तन असलेले कैदी तसेच ज्यांना असाध्य आजार आहे आणि वयोवृध्द कैदी यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरवर्षी ३० मार्च रोजी राजस्थान दिवस साजरा केला जातो.

“राजस्थान दिवसाचे औचित्य साधून, राज्यातील तुरूंगात बराच काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे १२०० कैद्यांना वेळेआधीच सोडण्यात येईल. यामध्ये झालेल्या शिक्षेपैकी बहुतांश शिक्षा पूर्ण झालेले आणि तुरुंगात चांगले वर्तन असलेले कैदी तसेच ज्यांना असाध्य आजार आहे आणि वयोवृध्द कैदी यांचा समावेश अशा लोकांचा यात समावेश आहे,” राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.

तुरूंग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगत गहलोत म्हणाले की, “बलात्कार, ऑनर किलिंग, मॉब लिंचिंग, पॉक्सो कायद्यासह २८ वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना कोणताही दिलासा मिळणार नाही.”

राजस्थान सरकारच्या म्हणण्यानुसार कोविड -१९ च्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी ज्या कैद्यांना कर्करोग, एड्स, कुष्ठरोग सारख्या गंभीर आजार आहेत त्यांना सोडले जाऊ शकते.

गहलोत म्हणाले, “७० वर्षापेक्षा जास्त वयाचे पुरूष आणि ६५वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या स्त्रिया ज्यांनी झालेल्या शिक्षेपैकी एक तृतीयांश शिक्षा भोगली आहे अशा कैद्यांना वेळेपूर्वीच सोडण्यात येईल.”