चित्रपट निर्माते अशोक पंडित राहुल गांधी आणि काँग्रेसवर कायम टीका करत असतात. आपल्या ट्विट्समुळे ते कायम चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत त्यांच्या नव्या ट्विटमुळे. या ट्विटमध्ये ते म्हणत आहेत की, दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केलं नाही जेवढं गांधी परिवाराने केलं आहे.

फक्त एवढंच नाही तर त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करण्याची मालिकाच सुरु केली आहे. ते म्हणतात, राहुल गांधी, तुमचा पक्ष गिलानींच्या उपचारासाठी दिल्लीतल्या पंचतारांकित रुग्णालयावर कोट्यावधींचा खर्च करतो. गिलानी हे हजारो काश्मिरी हिंदूंच्या मृत्यूचं कारण ठरले आहेत. शत्रूंसोबत उभं राहणं हे तुमच्या रक्तातच आहे.

स्टेन स्वामी यांच्या मृत्युवर भाष्य करत त्यांनी टीका केली आहे. ते म्हणतात, स्टेन स्वामी हे दंगल घडवण्याप्रकरणी कैदेत होते. पण प्रतिष्ठित वृत्तवाहिन्या, प्रतिष्ठित पत्रकारही या व्यक्तीला श्रद्धांजली देत आहेत. तो दिवस लांब नाही जेव्हा यासीन मलिकच्या निधनावरही श्रद्धांजली देतील.

राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटमधून स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावरुन पंडित यांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राहुल गांधींचं एक ट्विट हे गेल्या ७० वर्षांमध्ये काँग्रेसने नक्षलवादाला केलेलं समर्थन आणि पोषण दाखवून देतं. हजारो सैनिक शहीद झाले, नक्षली गाव मागास राहिले आणि देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. हा सगळा चीनचा कट होता.


अशोक पंडित पुढे म्हणतात, आपल्या फायद्यासाठी गांधी परिवाराने काश्मिरमधल्या दहशतवादाला खतपाणी घातलं. आणीबाणी लागू केली, नक्षलवादात वाढ झाली. दहशतवादी संघटनांनीही एवढं नुकसान केलं नाही जेवढं गांधी परिवाराने केलं आहे.