पाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. गुरुवारी विधानसभेच्या ३९ जागांसाठी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. या प्रकरणावरून मोठा गदारोळ उडाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. मतदानानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एका गाडीत ईव्हीएम मशीन सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीमध्ये हे ईव्हीएम मशीन सापडले, ती कार भाजपा उमेदवाराची असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असं आयोगाने सांगितलं.

आणखी वाचा- क्या स्क्रिप्ट है?; निवडणूक आयोगाच्या खुलाशावर प्रियंका गांधी भडकल्या

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

प्रियंका गांधींनी केली टीका

घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कडाडून टीका केली आहे. “प्रत्येकवेळी निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीनची खासगी सापडल्यानंतर अनेक गोष्टी सारख्याच असतात. पहिलं म्हणजे सर्वसाधारणपणे गाडी भाजपा उमेदवारांची वा त्यांच्या सहकाऱ्यांची असते. या प्रकारच्या व्हिडीओंना घटनेच्या स्वरूपात स्वीकारलं जातं आणि नंतर फेटाळून लावलं जातं. त्याचबरोबर भाजपा आपल्या माध्यमांचा वापर करून ज्या लोकांनी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आणल्या त्यांच्यावर आरोप करते. निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुर्नतपासणी करणे आवश्यक आहे,” असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.