गुवाहाटी : ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे निम्म्याहून अधिक जिल्हे पाण्याखाली गेल्याने आसाममधील पूरस्थिती शुक्रवारी अधिकच गंभीर झाली. पुरात तीन जण मरण पावले असून ४.२३ लाख लोक बाधित झाले आहेत. पुराचे पाणी लोहमार्गात शिरल्याने रेल्वे प्रशासनाला लमडिंग-बादरपूर मार्गावरील सेवा नियंत्रित ठेवणे भाग पडले आहे. धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्हे बाधित झाल्याचे आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. पुराचा सर्वाधिक तडाखा बारपेटाला बसला असून ८५ हजार जण बाधित झाले आहेत. जवळपास ४१ महसूल परिमंडळातील ८०० गावे पाण्याखाली असून दोन हजार बाधितांना ५३ मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला असून वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी तेथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर प्रशासनाला उपाययोजना आखावी लागली आहे, तर गोलघाट प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. राज्यातील अनेक नद्यांनी विविध ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. निमतीघाट आणि तेजपूर येथे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.