ब्रिटनच्या औषध नियंत्रकांचे मत

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका या कोविड प्रतिबंधक लशीच्या मात्रा १ कोटी ८१ लाख लोकांना आतापर्यंत दिल्या असून त्यात ७ जणांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही लस असुरक्षित आहे, असे सरसकट म्हणता येणार नाही, मृतांची संख्या नगण्य तर आहेच,  त्याशिवाय या लशीमुळे हे मृत्यू झाल्याचे पुरावे नाहीत, त्यामुळे ही लस सुरक्षित असून ती घेण्याचे थांबवू नये असे मत ब्रिटनच्या औषध नियंत्रकांनी व्यक्त केले आहे.

औषध व आरोग्य उत्पादन नियंत्रक संस्थेने म्हटले आहे की, ‘यलो कार्ड’ निरीक्षणानुसार करोना विषाणू प्रतिबंधक कार्यक्रमात १ कोटी ८१ लाख लोकांना ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस देण्यात आली असून त्यातील तीस जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे प्रकार झाले तर सात जण मरण पावले, अशी २४ मार्चपर्यंतची माहिती आहे. हीच लस भारतात कोव्हिशिल्ड नावाने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केली आहे. जोखमी पेक्षा या लशीचे फायदे अधिक असल्याचे ब्रिटिश औषध नियंत्रकांचे मत आहे.

नियंत्रकांच्या अहवालात म्हटले आहे की, आम्ही अतिशय कठोरपणे याचा आढावा घेतला असून काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात, पण हे प्रमाण फारच कमी आहे. २४ मार्चपर्यंत सेरेब्रल व्हेनस सायनस थ्राम्बॉसिसची २२ प्रकरणे झाली असून ८ प्रकरणांत रक्तातील बिंबिका म्हणजे प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या.

अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या ऑक्सफर्ड लशीची मात्रा घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याची तीस प्रकरणे रुग्णांमध्ये सामोरी आली आहेत. त्याची नोंद ब्रिटनच्या औषध नियंत्रकांकडे करण्यात आली आहे. औषध व आरोग्य नियामक संस्थेने म्हटले आहे, की रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता लशीमुळे कमी असली तरी ती काही प्रमाणात नाकारता येत नाही. तरी लोकांनी लस घेण्याचे टाळू नये. गेल्या शनिवारी २४ मार्चपर्यंत   १ कोटी ८१ लाख  जणांना लशीच्या  मात्रा देण्यात आल्या होत्या. त्यात रक्ताच्या गुठळ्यांची एकही तक्रार फायझर व बायोएनटेक यांनी तयार केलेल्या लशीबाबत आली नाही. अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीबाबत अनेक देशात तक्रारी आल्या होत्या.

असून त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन रुग्णांचे बळी गेले आहेत. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी व नेदरलँड्स या देशात ही लस काही वयोगटाच्या व्यक्तींसाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. जर्मनी व कॅनडा यांनी साठीखालील व्यक्तींना ही लस घेण्यास मनाई केली आहे. काही देशात त्याबाबत वेगळ्या वयोगटात मनाई करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही ही लस वापरण्यास हरकत नसल्याचेच मत व्यक्त केले आहे.

 

बहुस्तरीय मुखपट्टीमुळे संसर्गाला ९६ टक्के प्रतिबंध

वॉशिंग्टन : बहुस्तरीय मुखपट्टी जर तोंडावर व्यवस्थित पद्धतीने लावली तर संबंधित व्यक्तीच्या नाकातोंडातून बाहेर पडणारे ८४ टक्के कण हे रोखले जातात. जर दोन व्यक्तींनी मुखपट्टी चांगल्या पद्धतीने लावली तर संसर्ग ९६ टक्कय़ांच्या आसपास कमी होतो. कोविड १९ पासून मुखपट्टीने बचाव होतो हे  वैज्ञाानिकांनी आतापर्यंत सांगितले आहे, त्याबाबत अमेरिकेतील जॉर्जिया तंत्रज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी अधिक संशोधन केले आहे. त्यांच्या मते मुखपट्टी कशाची बनवली आहे, नाकातोंडावर ती किती व्यवस्थित बसते ते, किती स्तरांची ती मुखपट्टी आहे यावर त्यापासून किती सुरक्षा मिळणार हे अवलंबून असते.

‘एरोसोल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’  या नियतकालिकात म्हटले आहे,की सूक्ष्म कण गाळण्याची मुखपट्टीची क्षमता महत्त्वाची असते. सूक्ष्मकण हे मुखपट्टीने रोखले जात असले तरी अति सूक्ष्म कण त्यातून आरपार जाऊ शकतात. सूक्ष्मकण हे काही तास किंवा काही दिवस हवेत राहू शकतात. हवेशीर जागा असेल तर ते राहत नाहीत. पुरेशी हवा नसलेल्या खोलीत ते बराच काळ राहतात.

असे या संशोधन निबंधाचे लेखक गा ली यांनी म्हटले आहे. वैज्ञानिकांनी या संशोधनात ३३ प्रकारच्या वेगवेगळ्या अस्तरांवर प्रयोग करून पाहिले, त्यात कापड, सेल्यूलोज व इतर घटकांच्या मुखपट्टय़ांचा समावेश होता. यात प्रत्येक साहित्यात गाळण क्षमता वेगळी होती. धागा,धाग्याची घनता, मुखपट्टी बनवितानाची विशिष्ट रचना यावर मुखपट्टीची परिणामकारकता अवलंबून असते.