त्रिपुरातील डोंगराळ भाग आणि अन्य काही ठिकाणी हिवतापाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला असून त्यामुळे आतापर्यंत २१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ४०० जण आजारी पडले आहेत, असे त्रिपुराच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री बादल चौधरी यांनी वैद्यकीय पथकासह धलाई जिल्ह्य़ाकडे धाव घेतली असून आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. परिस्थिती युद्धपातळीवर हाताळण्यात येत आहे, असे चौधरी म्हणाले.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी गुरुवारी रात्री परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुख्य सचिव जी. के. राव आणि आरोग्य सचिव किशोर अंबुली आणि ज्येष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली.
धलाई जिल्ह्य़ात १६ जण हिवतापाने दगावल्याने तेथे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत जवळपास ६० जण दगावल्याचे आणि ९०० जण आजारी असल्याचे अनधिकृतपणे सांगण्यात येत आहे.