लखनौ : वाजपेयी १९४५ मध्ये जेव्हा २१ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी कानपूर येथे कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता तेव्हा त्यांचे सहाध्यायी होते त्यांचे वडील. जे तीस वर्षे शिक्षकाची नोकरी करून निवृत्त झाले होते. वडील व मुलगा एकाच संस्थेत शिकण्याचा हा प्रसंग वेगळाच होता. त्यांचे वडील पंडित कृष्णबिहारीलाल वाजपेयी हे त्यावेळी पन्नाशीच्या पुढे होते. कानपूर येथे डीएव्ही कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेताना वडील मुलगा एकाच वर्गात होते.

वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या या संस्थेने २००२-०३ मध्ये एक अंक काढला होता, त्यात वाजपेयी यांनी  लिहिलेल्या लेखात या घटनेचा उल्लेख आहे. वडील आणि मुलगा एकाच संस्थेत एकाच वर्गात शिकल्याची घटना कधी तुम्ही ऐकली आहे का, असा प्रश्न करून वाजपेयी यांनीच ही हकीगत सांगितली आहे. ‘कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमध्ये मी व वडील एकाच वर्गात होतो असे वाजपेयी यांनी लिहिले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य अमित कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, वाजपेयी व त्यांचे वडील एकाच वर्गात कायद्याचे शिक्षण घेत होते पण नंतर त्यांची त्यातील शाखा वेगळी झाली. वडील वर्गात उशिरा यायचे तेव्हा तुझे वडील कुठे बेपत्ता झाले होते ते विचार असे शिक्षक हसून म्हणायचे. मी उशिरा यायचो तेव्हा ते वडिलांना तुमचा मुलगा कुठे बेपत्ता होता असे विचारायचे. त्यामुळे आमची अडचण होत असे त्यामुळे मी कायद्यातील दुसरे विषय निवडले व एकाच वर्गात नंतर राहिलो नाही. १९४५-४६ मध्ये ग्वाल्हेरच्या व्हिक्योरिया कॉलेजमधून मी बीए केले पण भवितव्याची चिंता होती कारण वडील  सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. माझ्या दोन बहिणींचे लग्नाचे वय होते.

हुंडा ही प्रथा त्यावेळी होती त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी पैसे कुठून आणणार हा प्रश्न होता. पण सर्व मार्ग बंद झाल्यावर ग्वाल्हेरचे महाराजा श्रीमंत जिवाजीराव शिंदे यांनी मला ७५ रुपये शिष्यवृत्ती दिली ती आजच्या (२००२-०३ च्या काळात २०० रुपये होती) मग वडिलांच्या चेहऱ्यावरची काळजी कमी झाली. कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास टाकला व नंतर मीही स्वप्नांच्या सागरात उडी घेतली, शिष्यवृत्तीनंतर मी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजात प्रवेश घेतला कारण त्यावेळी बरेच विद्यार्थी तिकडेच जात होते. त्यामुळे घरच्यांनी मला कानपूरला जायला  सांगितले होते. माझे थोरले बंधू प्रेम बिहारी वाजपेयी हे तेथे कायद्याचे शिक्षण घेत होते. पण तेव्हा वेगळीच घटना घडली. माझ्या वडिलांनी उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले व आम्हाला आश्चर्य वाटले ते ३० वर्षे शिक्षक म्हणून काम करून निवृत्त झाले होते.

मी एमए करण्यासाठी कानपूरला जायला निघालो व कायद्याच्या शिक्षणासाठी वडीलही कानपूरला जाऊ इच्छित होते. ते पन्नाशीच्यावर होते. पांढरे केस, हातात काठी असे माझे वडील पंडित कृष्णबिहारीलाल वाजपेयी हे प्राचार्य काल्का प्रसाद भटनागर यांच्या कार्यालयात गेले, हे वृद्ध गृहस्थ प्राध्यापकाची नोकरी मागण्यासाठी आले असावेत किंवा कुणाला तरी प्रवेश घेण्यासाठी आले असावेत असे भटनागर यांना वाटले पण वडिलांनाच प्रवेश घ्यायचा आहे हे त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते उडालेच व नंतर ही बातमी कॉलेजात पसरली.